दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!

सकाळ वृत्तसेवा

जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली, तेव्हा तिच्या मदतीला धावला महाराष्ट्र. इतिहासाची पाने उलगडताना अगदी आजपर्यंत याचे दाखले मिळतात. असाच एक दाखला भारत इतिहास संशोधक मंडळाने जतन केला आहे. दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना दिल्लीची जबाबदारी अक्षरशः आमंत्रण देऊन सोपवली होती, याचा पुरावा असणारे एक अस्सल फर्मान मंडळात आहे. पानिपतच्या लढ्याच्या आधीच्या दहा वर्षांतले हे फर्मान असल्याने त्याला आगळे महत्त्व आहे.

सन 1754 ते 1759 या काळात मुघल बादशहा दुसरा अलमगीर अझिजुद्दिन महंमद हा दिल्लीच्या तख्तावर होता. 1747 पासून अहमदशहा अब्दालीच्या भारतावरच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या. पानिपतचे युद्ध होईपर्यंत म्हणजे 1761 पर्यंत अब्दालीने भारतावर एकूण पाच वेळा स्वारी केली. त्यातल्या चौथ्या मोहिमेनंतर राघोबादादांनी अब्दालीच्या मुलाला तैमूरला पळवून लावत अटकेपार मराठी राज्याचा झेंडा फडकवला. त्यानंतरच्या अब्दालीच्या स्वारीत घडले ते "पानिपत'. दरम्यानच्या काळात दिल्लीचा मुघल दरबार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होता.

वास्तविक पाहता 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा उत्तरेतला प्रभाव वाढत होता. त्याला कळस चढला तो 17व्या शतकातल्या सहाव्या दशकात. 1754 ते 1759 या काळात दिल्लीचा बादशहा आलमगीर दुसरा याला सतत आपल्या राज्याची चिंता वाटत होती. एका बाजूला अब्दालीच्या आक्रमणाचे भय होते, तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत दगाफटक्‍याची टांगती तलवार त्याच्या डोक्‍यावर होती. त्याच स्थितीत त्याने मराठ्यांच्या नावे एक फर्मान पाठविले. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, त्याने हे फर्मान आपल्या दरबारी पद्धतीतून न पाठविता आपल्या खास दूताच्या हस्ते पुण्याकडे रवाना केले होते. मात्र, याला फारसा दुजोरा मिळत नाही.

आपल्या सही-शिक्‍क्‍याचे हे फर्मान आलमगीराने थेट सदाशिवराव पेशव्यांच्या नावे पाठविले होते. बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांचाही त्यात उल्लेख होता. या फर्मानात तीन विनंत्या करण्यात आल्या होत्या. मराठ्यांनी बादशहाच्या रक्षणासाठी फौज तैनात करावी, असे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे आवाहन त्यात होते. दिल्लीचा वझीर आणि मीरबक्षी (सैन्याचे पगारपाणी पाहणारा अधिकारी किंवा आताच्या भाषेत पे-मास्टर जनरल) या दोन्ही पदांवर मराठ्यांनीच आपली माणसे नेमावीत, हे दुसरे आवाहन बादशहाने केले होते. त्या वेळी बादशहा एवढा अगतिक झाला होता, की सरळ नामधारी बादशहा म्हणून राहून मराठ्यांच्या ताब्यात हिंदुस्थानची सत्ता सोपवण्याचीही त्याची तयारी झाली होती, हे तिसऱ्या आवाहनावरून दिसते. मराठ्यांनी बादशहासाठी तनखा सुरू करावा, असे हे तिसरे आवाहन आहे.

पर्शियन भाषेचे अभ्यासक राजेंद्र जोशी यांनी या फर्मानाचा अभ्यास केला आहे. त्यांनीच या फर्मानाची माहिती "सकाळ'शी बोलताना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम आबासाहेब मुजुमदार यांनी 1920 मध्ये या फर्मानाची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर इतिहासकार ग. ह. खरे यांनीही त्या फर्मानाचा अभ्यास केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या फर्मानाचा अभ्यास होत आहे.

श्री. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठ्यांनी बादशहासाठी तनखा सुरू केला, तसेच अंताजी माणकेश्‍वर या आपल्या सरदाराला बादशहाच्या रक्षणासाठी पाठविले. फर्मानातली तिसरी गोष्ट मराठ्यांनी केली नाही, ती म्हणजे दिल्लीतल्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वतःकडे घेणे. त्या काळात दिल्लीच्या तिजोरीत खडखडाट होता, त्यामुळेच मराठ्यांनी हे उत्तरदायित्व स्वतःकडे घेतले नसावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

हे फर्मान म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. मराठी साम्राज्याची ताकद कळसाला पोहोचल्याचा हा संकेत होता.
- पांडुरंग बलकवडे, इतिहासाचे अभ्यासक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या