हॉलीवूडच्या तुलनेत आपण...


साय-फाय आणि सुपरहिरोच्या बाबतीत आपल्याकडे जास्त सिनेमे निघाले नसले तरी काही दशकांपूर्वी शक्तिमान मालिका, पारसमणी, तुफान, आजूबा, मिस्टर इंडिया, शहेनशाह असे सिनेमे आपल्या देशात तयार करण्यात आले आणि ते सर्व यशस्वी देखील झाले. काळ बदलत गेला तसतशी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. Hollywood मध्ये Avatar, Spider-Man, Iron-Man, Avengers Series, Bat-Man असे मोठमोठे सिनेमे आले. या सर्व सिनेमांनी भरभरून तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला. त्यामानाने आपला देश थोडा (जास्तच) मागे राहिला. तरीही तंत्रज्ञानाचा छोटा-मोठा वापर करून आपल्या देशात सिनेमे येतच होते. मात्र एखाद्या सुपरहीरोवर सिनेमा काढावा असे धाडस कोणी दाखवत नव्हते. अशा वेळी शाहरुख खानने रा.वन सिनेमाची घोषणा केली. तत्पूर्वी शाहरुख खानने रेड चिलीज व्ही.एफ.एक्स. द्वारे भारतामध्ये जागतिक दर्जाची व्ही.एफ.एक्स. कंपनी सुरु केली होती, ज्यातून जवळपास १८ ते २० सिनेमे अधिक आकर्षक बनवले. यात ओम शांती ओम, रा.वन, विश्वरुपम, क्रिश ३, डॉन २ या सिनेमांचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण भारताने असे सिनेमे तोपर्यंत पहिले नव्हते. शाहरुख खानने उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद होतं, मात्र याची जास्त कोणी दाखल घेतली नाही.


रोबोट या सिनेमाची देखील घोषणा करण्यात आली. दिग्दर्शकाने रोबोट सिनेमासाठी रजनीकांत सरांच्या आधी शाहरुख खानला पसंती दिली होती. रा.वन सिनेमा करत असल्याने शाहरुखने तो सिनेमा नाकारला आणि रजनीकांत सरांनी तो सिनेमा स्वीकारला. यात कुठला वाद झाला नाही, दिग्दर्शकाने देखील ते मान्य केलं. कारणही तसंच होतं, रा.वन आणि रोबोट असे दोन्ही मोठे, खर्चिक सिनेमे एकाच वेळी करणे शाहरुखला शक्य नव्हते. आणि मग आले रोबोट आणि रा.वन असे सिनेमे, यात रोबोट हा सिनेमा सर्वांना आवडला. रजनीकांत सर असल्याने 'सोने पे सुहागा'च, शाहरुखच्या रा.वन बाबत मात्र संमिश्र प्रतिक्रिया आल्या तरी त्यातील स्पेशल इफेक्ट्स ने भारताला एक नवा चेहरा दिला. आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत हॉलीवूडच्या तोडीस तोड आहोत हे शाहरुख ने दाखवून दिले. नेमकी हीच गोष्ट राकेश रोशन यांना इतकी भावली की क्रिश ३ च्या बाबतीत त्यांनी आपली वाटचालच बदलली.

क्रिश ३ हा सिनेमा कोणत्याही बाबतीत कमी पडू नये यासाठी राकेश रोशन यांनी हॉलीवूड मधील तंत्रज्ञांशी बोलणी सुरु केली होती. रा.वन पाहिल्यानंतर त्यांना कळून चुकले, आपल्या देशात इतके प्रगल्भ कलाकार आणि तंत्रज्ञ आहेत तर आपण भारताबाहेरली तंत्रज्ञांना का विचारावे? मग त्यांनी कॅमेरामनपासून एडिटर पर्यंत फक्त भारतीय कलाकार आणि तंत्रज्ञांनाच संधी दिली. फक्त स्टंट्स च्या बाबतीत आपण तितके प्रगत नाही आहोत म्हणून त्यांनी स्टंट्ससाठी टॉन चिंग यांची निवड केली. व्ही.एफ.एक्स.साठी शाहरुख खानच्या कंपनीची निवड केली, निवेदक म्हणून अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला आणि फक्त भारतीय कलाकार एकत्र येऊन काय करू शकतात हे दाखवले.

यात शाहरुख खानचं विशेष कौतुक करावसं वाटतं, फक्त कलाकार म्हणून अभिनय करण्यापेक्षा त्याने काळाबरोबर बदलत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठं पाऊल उचललं. सिनेमातील नेत्रसुखासाठी एखाद्या कलाकाराने उचललेलं हे पाऊल खूप मोठं आहे. तसेच या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या देशातील सिनेमे पुढे नेण्यासाठी करताना त्याने आणखी नवनवीन संकल्पना सुरु केल्या आहेत ज्याची माहिती आपणांस पुढच्या लेखात देण्यात येईल.

क्रिश ३ सिनेमातील गाणी दुर्लक्षित केली तर हा हॉलीवूडच्या तोडीस सिनेमा आहे. या सिनेमामुळे संपूर्ण जगाला भारतीय कलाकार आणि तंत्रज्ञांची क्षमता समजली आहे. आज हॉलीवूड आणि परदेशातून भारतीय तंत्रज्ञांना विचारले जात आहे.

मित्रांनो एवढेच सांगावेसे वाटते, आपल्याकडे एक से बढकर हिरे आहेत. एकत्र येऊन बघा, आपण काय करू शकतो ते, मग बघा, आपल्याकडून देखील सर्वोत्तम गोष्टी घडून येतील.



फक्त एवढेच करा, "दूरदृष्टी ठेवा, एकत्र या आणि एकमेकांना सहाय्य करा."
आपलाच,
अभिषेक ठमके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या