'अर्जुन'

अर्जुन हा सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सचित पाटील आणि अमृता खानविलकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. .मराठी माणसाला साद घालणारा विषय असल्यानं प्रेक्षक तो पहाण्यासाठी आवर्जून हजर झाले होते. हा सिनेमा त्यांना मनापासून आवडला आहे.
या सिनेमात मराठी तरूणांना उद्योगधंद्याकडे वळण्याचा संदेश देण्यात आला आहे. या सिनेमात अर्जुन पवार या मराठी तरूणाची कथा दाखवण्यात आली आहे. अर्जुन हा सर्वसामान्य मराठी कुटुंबातला एक तरूण असतो. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या अर्जुनला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. त्यानुसार घरच्यांचा विरोध न जुमानता अर्जुन स्वतःच्या व्यवसायाला सुरूवात करतो आणि अनेक प्रस्थापितांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकतो. या संघर्षात तो नेमका एका चक्रव्युहात अडकतो. या चक्रव्युहातून तो नक्की कसा बाहेर येतो ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सिनेमातले दमदार डायलॉग्ज, चकचकीत सादरीकरण आणि मराठी अस्मितेला साद देणारा संदेश यांच्या जोरावर हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला आहे. सचित पाटीलनं या सिनेमात अर्जुनची भूमिका साकारली आहे. तर अमृता खानविलकरनं त्याची प्रेयसी अनुष्काच्या रोलमध्ये आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमानंतर अभिनेते विद्याधर जोशी या सिनेमात पुन्हा एकदा निगेटिव्ह रोलमध्ये दिसेल. कलाकारांच्या कामाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली आहे. मराठी अस्मितेच्या विषयाला हात घातलेले सिनेमे मराठी प्रेक्षकाला नेहमीच आवडतात. अर्जुन हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. सिनेमाच्या सफाईदार टेकिंग आणि योग्य एडिटिंगमुळे तो रटाळ होत नाही. कथेची मांडणीही एकसंध असल्यानं सिनेमाची गती राखण्यातही दिग्दर्शक एमएफ ईलियास यांना यश आलंय. ललित सेन यांची गाणीही चांगली झालीत. प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेले स्टार्स पाहिले की प्रेक्षकांनाही या गोष्टी कळल्याचं लगेचच लक्षात येतात. चांगली कथा, उत्तम सादरीकरण आणि जोडीला हिंदी सिनेमाशी स्पर्धा नसल्यानं त्याचा फायदा अर्जुन या सिनेमाला मिळाला आहे. एकाचवेळी सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्सेसमध्येही त्याला चांगलं ओपनिंग मिळालं आहे. सिनेमाची घोडदौड पहाता या अर्जुननं आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतलाय असंच म्हणावं लागेल.